Thursday 12 January 2012

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मा साहेबांच्या जयंती निमित्त.....

अग्निरेखा.....!!
आज १२ जानेवारी सर्व मराठ्यांनी आपल्या मनात कोरून ठेवावा असा दिवस...महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटनी देणाऱ्या, सुराज्याची स्वप्न साकारणाऱ्या, स्वाभिमानी, जाधवांची कन्या तर भोसलेंची सून असलेल्या राजमाता जीजाऊंची जयंती.... ज्यांनी सर्व मराठ्यांच्या रक्तात स्वाभिमान भिनवला प्रत्येक  मावळ्यात शिवबा घडवला..ज्यांनी आपले उभे आयुष्य या स्वराज्याचा जडण घडनासाठी पणाला लावले.. वेळोवेळी पत्नी म्हणून धीराने शहाजी राज्यांच्या सोबत उभ्या राहिल्या..शिवरायांच्या मातृत्व बरोबरच गुरुत्वही स्वीकारले अशा कर्तुत्ववान “राजमाता जीजाऊ” मासाहेबांची जयंती.....
पित्याच्या शिलेदारीमुळे जन्मापासूनच दैवी आलेल्या असहाय भ्रमंतीचे चटके बसलेल्या, लग्नझाल्यावरही परत तीच दु:खद भ्रमंती वाट्याला आल्याने आणि ही भ्रमंती म्हणजे केवळ विषवृक्षाला खतपाणी घालण्याचा प्रकार आहे ही जाणीव झालेल्या जीजाऊंना अनंत तीबलेनी ‘अग्निरेखा’ म्हणून संबोधले आहे.. ‘अग्निरेखा’ जणू डीवचलेली नागीण,रौद्ररुप धारण केलेली आकाशाची चपला...जी क्षणातच सार ब्रम्हांड उजळून टाकते अशी अग्निरेखाच...!!! ती केवळ निमिषमात्रच चमकते पण सार ब्रम्हांड हादरवून टाकणारा आवाज करते, कसं घडलं याचा मागमूस ही न ठेवता जशी येते तशी निघूनही जाते...
राजमाता जिजाऊ ही अशाच पिता नी पती यांच्या सहवासात दरवेशाच निराधार जीवन जगल्या...पित्याची अमानुष हत्या पाहिली, पतीची अवहेलना उरत जतन करून ठेवली... पती हयात असताना परीत्यक्तेच जीवन वाट्याला येऊनही धीर सोडला नाही... आपण स्त्री आहोत, दुबळ्या आहोत असा विचारही स्पर्शु न दिलेल्या स्वभिमानी कन्या, कर्तुत्ववान पत्नी, देव-धर्म देशावर प्राणांहून अधिक प्रेम करणारी माता, बलवंत असूनही यावनी चाकरी करत पातशहाच्यासमोर गर्दन झुकावनाऱ्यांनची कीव न करणाऱ्या हिंदू स्त्री...
वीर संभाजी राजे आणि पिता, बंधू दत्ताजीच्या अकाली मृत्यूने दगलबाज यवनांना पुरत्या ओळखून चुकलेल्या मानी स्त्री...पातशाहीच्या काळात कर्तबगार वजीर म्हणून मिरवणाऱ्या, स्वैराचारी यवनांच्या  दुर्बलाने पेटलेल्या असतानाही धाडसाने मान वर करून पाहणाऱ्या.. आपल्या पुत्रात या स्वैराचारी यवनांच्या दगलबाजी विरुद्ध भावना ठेचून भरणाऱ्या आणि त्याला शस्त्र, अस्त्रविद्या, राजकारण समजावून सांगून बलवंत बनविणाऱ्या एक जिद्दी माता.....
‘अग्निरेखा’ मा जिजाऊ एक माता होत्या एका युगपुरूषाची पण केवळ माताच नाही तर कुणाची तरी  कन्या, पत्नीही होत्या..सर्व सामान्य स्त्रीला जी नातेसंबंध,बंधन असतात तशी सारी नाती त्यांनाही होती,  त्यांनी ती पत्कारली ही...पिता, बंधू, ज्येष्ठ चिरंजीव संभाजीच्या हत्येने विव्हळ बनल्या, पतीच्या अपमानाने चीडल्याही..पण हे सार असतानाही त्यांनी आपले कर्तव्य सोडले नाही जिद्द सोडलं नाही...
“माता ही खऱ्या अर्थाने एक शिल्पकार असते..तिने दिलेले बोध,ज्ञान हा कुठल्याही ग्रंथापेक्षा जास्त पवित्र,प्रभावशाली असते...आपल्या अपत्यांना घडविण्याच कर्तव्य तिला पार पडावच लागतं”.....
जीजाऊ साहेबांनी ही तसचं केल...जन्माला घालतानाच शिवरायांना आपलं सुन्दर रूप दिल..अगदी तसच त्याचं चरित्रही घडवलं....शस्त्रविद्या,अस्त्रविद्या,राजकारण आणि यावनांबदलचा द्वेश अगदी ठासून भरला..देव,धर्म, देशावर प्रेम करायला शिकवलं... जीजाऊंसाहेबांनी आपल्या सुसंस्काराने एक पातशाह बनविला जो सिंहासनावर बसण्याआधीच “राजे” म्हणून मान्यता पावला...असा बादशाह-“छत्रपती शिवराय”... शेवटी कित्येक वर्षाच्या संघर्षानंतर ३२ मन सोन्याचे सिंहासन रायगडी अवतरले आणि आपल्या “छत्रपती शिवराय” मिळाले ते या माऊलीमुळेच..त्यांच्या आशीर्वादानेच.....
शिवरायांच्या हातून त्यांनी एक नवा इतिहास घडविला.....नवा सुराज्य स्थापित केलं.....
हिंदू हिंदू म्हणून जगाला तो या अग्निरेखेच्या प्रकाशामुळेच..... अशा या “अग्निरेखा” राजमाता जिजाऊ साहेबांना त्यांच्या ह्या जन्मदिनी कोटी कोटी प्रणाम...!!!
जय जिजाऊ !!
जय शिवराय !!
       राजमाता जिजाऊसाहेबांबद्दल लिहिण्याचा हा छोटासा प्रयत्न...जर काही चुकलं असेल तर क्षमा असावी...
- दिपीका.....

No comments:

Post a Comment