Showing posts with label काव्यसारिता.... Show all posts
Showing posts with label काव्यसारिता.... Show all posts

Sunday, 12 August 2012

माझ्यापरीने मी.....

चंद्रशेखर गोखले उर्फ चांगो  यांच्या ‘माझ्यापरीने मी’ या चारोळी संग्रहातील जीवनाचा वास्तविक दर्शन घडविणाऱ्या, विविध विषयांना हाताळत जीवनाची सत्यता सांगणाऱ्या काही सुंदर चारोळ्या...........

एक ओळख लागते आपल्याला
माणूस म्हणून जगण्यासाठी
इतकंच कशाला एकांतात
आरशात स्वतःला बघण्यासाठी.....

केवळ उडता येत म्हणून
फुलपाखरू उडत नाहीत
पण जरा निवांत बसली तर
माणसं त्यांना सोडत नाहीत.......

आपसूक डोळे भरून येतात
रडायचं नाही ठरविल्यावर
मन  काहीतरी शोधत राहतं
जसं आपण शोधतो काही हरवल्यावर......

आरशात पाहताना हल्ली मला
माझी बरीच रूप दिसतात
आश्चर्य म्हणजे त्यातील बरीच
मला अनोळखी असतात....

रडायचं नाही म्हणून
गुदमरत राहिलास
आणि जरासं थोपटलं तर
बांध फुटल्यागत वाहीलास .....

आभाळभर पाखरं
आणि मुठभर दाणे
आता कुणाला अधिक
तर कुणाला उणे.....

देहाला पोसण्यासाठी
मनाला किती सोसाव लागतं
आकांत करत एका जागी
निमुटपणे बसव लागतं....

ओंजळ भरून सांगितलं तर
ओंजळ भरून मिळतं
पण आपली ओंजळ भरली हे
कितीजणांना कळतं......

---चंद्रशेखर गोखले.....

Monday, 23 July 2012

आयुष्य...


कवी उ. रा. मिरी यांच्या  “मी एकटा निघालो”  या कवितासंग्रहातील आयुष्याकडे डोळसपणे, सकारात्मक दृष्टीने पाहायला शिकविणारी....शब्दात न मावणाऱ्या आयुष्याची अनंत रूपे कवेत घेत बरंच काही बोलणारी ही एक सुंदर कविता....
*** आयुष्य ***
आयुष्य एक यात्रा, आयुष्य एक मेळा
आयुष्य वेदनांचा, खग्रास ठोकताळा...
आयुष्य माणसांच्या, झपताल भावनांचा
आयुष्य वासनांचा, रंगीत पावसाळा...
आयुष्य उर्वशीची, कर्पूरगौर काया
घननीळ मैथुनाचा, आयुष्य कैफ काळा...
आयुष्य निग्रहाची, दुर्दम्य अग्निरेखा
आयुष्य आग्रहाची, अलमस्त धर्मशाळा...
आयुष्य अस्मितेचा, बेलाग एक किल्ला
दुनिये विरुद्ध जुलमी, आयुष्य एक हल्ला...
आयुष्य एक सीधे, आव्हान काळ पुरुषा
बिनतोड आसवांचा, आयुष्य हा रिसाला...
विरास विक्रमाची, आयुष्य एक संधी
आयुष्य शंकराचा, तिसरा अजेय डोळा...

   --- उ. रा. मिरी.

Tuesday, 3 July 2012

तहान......


कवी म.म. देशपांडे यांची सभोवतीचे अव्यक्त दुःख सूचकपणे आणि उत्कटतेने व्यक्त करणारी....मृत्यूनंतरही जनमाणसांच्या मनात ‘चिरंजीवी’ असण्याची आर्तता अन् उत्कटता प्रगट करणारी तहान ही कविता...
***तहान***
सारा अंधारच प्यावा
अशी लागावी तहान,
एका साध्या सत्यासाठी
देता यावे पंचप्राण...

व्हावे एवढे लहान
सारी माने काळो यावी;
असा लाभावा जिव्हाळा
पाषाणाची फुले व्हावी...

सर्वकाही देता यावे
श्रेय राहू नये हाती;
यावी लाविता कपाळी
भक्तिभावनेने माती...

फक्त मोठी असो छाती
दुःख सारे मापायला ,
गळो लाज, गळो खंत
काही नको झाकायला...

राहो बनून आकाश
माझा शेवटचा श्वास;
मनामनात उरावा
फक्त प्रेमाचा सुवास...!!

---म. म. देशपांडे.

Tuesday, 5 June 2012

जगत मी आलो असा…

सुरेश भट यांच्या “रंग माझा वेगळा” या काव्यसंग्रहातील ही एक अर्थपूर्ण...अप्रतिम अशी गझल...
जगत मी आलो असा
जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही
एकदा तुटलो असा की,  मग पुन्हा जुळलोच नाही...!
जन्मभर अश्रुस माझ्या शिकविले नाना बहाने,
सोंग पण फसव्या जिण्याचे, शेवटी शिकलोच नाही..!
कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो,
पण प्रकाशाला तरीही हाय, मी पटलोच नाही..!!
सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी ;
एकदा हसलो जरासा, मग पुन्हा हसलोच नाही..!!
स्मरतही नाही मजला चेहरे माझ्या व्यथांचे
एवठे स्मरते मला की, मला मी स्मरलोच नाही..!!
वाटले मज गुणगुणावे, ओठ पण झाले तिऱ्हाईत
सुचत गेली रोज गीते, मी मला सुचलोच नाही..!!
संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा
लोक मज दिसले अचानक, मी कुठे दिसलोच नाही...!!
----सुरेश भट....

Tuesday, 29 May 2012

लाभले आम्हास भाग्य....


कवी सुरेश भट यांचे मराठीची थोरवी गाणारे, अवघ्या मराठी जनांना आपलेसे करणारे मराठी अभिमान गीत....
लाभले आम्हास भाग्य....

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी...

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी...

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी...

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी...

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी...

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी...

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी...

कवी - सुरेश भट...

Tuesday, 15 May 2012

"स्वातंत्र्यदेवीची विनवणी' 1997 साली भारतीय स्वातंत्र्याच्या पन्नाशीनिमित्त कुसुमाग्रजांनी लिहिली कविता..... स्वातंत्र्योत्तर काळात जनतेने कसे वागावे तसेच व्यावहारिक आणि सामाजिक आशयाशी संलग्न असलेली.... कालच सांगितलेल्या आजच्या स्थितीवर चिंतन आणि मनन करायला लावणारी ही कविता....
स्वातंत्र्यदेवीची विनवणी...


 पन्नशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका ।
मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका ॥   

सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे ।
काळोखाचे करून पूजन घुबडांचे व्रत करू नका ॥

अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका ।
अंध प्रथांच्या कुजट कोठारी दिवाभीतासम दडू नका ॥

जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा ।
एकविसावे शतक समोरी सोळाव्यास्तव रडू नका ॥

वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे ।
करतील दुसरे, बघतील तिसरे असे सांगुनी सुटू नका ॥

जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा ।
मेजाखालून, मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका ॥

बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना ।
कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांझ गोडवे गाऊ नका ॥

सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने ।
करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका ॥

प्रकाश पेरा अपुल्या भवती दिवा दिव्याने पेटतसे ।
इथे भ्रष्टता, तिथे नष्टता, शंखच पोकळ फुंकू नका ॥

पाप कृपणता, पुण्य सदयता, संतवाक्य हे सदा स्मरा ।
भलेपणाचे कार्य उगवता कुठे तयावर भुंकू नका ॥

------- कुसुमाग्रज

Tuesday, 1 May 2012

सागरावर रूसलेला, मातृभूमीला कायमचा दुरावले जाऊ या वेदनेतून निर्माण झालेले ह्या अप्रतिम काव्यातून वीर महापुरूषाचं मातृभूमीवरचं प्रेम आणि तिच्या भेटी आड येणा-या सागरावरचा रोष प्रकट करणारे हे तुफानी काव्य.....!

सागरा प्राण तळमळला.....
ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा प्राण तळमळला ॥धृ॥
भूमातेच्या चरणतला तुज धूता । मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशि चल जाऊ । सृष्टिची विविधता पाहू
तैं जननीहृद् विरहशंकितहि झाले। परि तुवां वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन । त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी । मी जगद्नुभवयोगे बनुनी मी
तव अधिक शक्ती उद्धरणी । मी येईन त्वरे कथुनि सोडिले तिजला ॥१।।
सागरा प्राण तळमळला.....

शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी । ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु या पुढती । दशदिशा तमोमय होती
गुणसुमने मी वेचियली या भावे । की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता । रे नवकुसुमयुता त्या सुलता रे
तो बाल गुलाबहि आता । रे फुलबाग मला हाय पारखा झाला ॥२।।
सागरा प्राण तळमळला.....

नभि नक्षत्रे बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी । आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य मज प्रिया साचा । वनवास तिच्या जरि वनिचा
भुलविणे व्यर्थ हे आता । रे बहु जिवलग गमते चित्ता रे
तुज सरित्पते जी सरिता । रे त्वदविरहाची शपथ घालितो तुजला ॥३।।
सागरा प्राण तळमळला....

या फेनमिषें हससि निर्दया कैसा । का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते । भिनि का आंग्लभूमीते
मन्मातेला अबला म्हणुनि फसवीसी । मज विवासनाते देशी
तरि आंग्लभूमी भयभीता । रे अबला न माझि ही माता रे
कथिल हे अगस्तिस आता । रे जो आचमनी एक क्षणी तुज प्याला ॥४।।
सागरा प्राण तळमळला.....

Sunday, 8 January 2012

***
ते बालपण,सुंदर निरागस मन...कुठलीही इर्शा भाव नाही,मौजेचे ते अनमोल क्षण...
अल्लड

दिपीका...